गुणहीन साक्षरतेचा आग्रह ?
वाचकहो, नमस्कार! भाषा समजून घेऊन आपल्याला लिहिता वाचता यायला लागले की आपण साक्षर ठरतो आणि ही निश्चितच आनंदाचीच गोष्ट आहे की लिहिता वाचता येते. आणि याविषयी तिळमात्र शंका नाही की देशपातळीवर जो साक्षरतेचा आग्रह धरला जातो तो कशा साठी किंवा हे किती आवश्यक आहे त्याबद्दल कारण, लिहिणे, वाचणे, संख्या गणित करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे तसा आग्रह धरला देखील पाहिजे पण, सोबतच आपण शिक्षणाचा आग्रह का धरत नाही.? गोंधळलात ना? चला तर मग आज बोलूयात या विषयावर.
पूर्वी साक्षरतेची व्याख्या फक्त ७ वर्षावरील व्यक्ती भाषा समजून घेऊन लिहू व वाचू शकत असल्यास त्यास साक्षर समजले जाई आज विविध महत्वाकांक्षी योजने अंतर्गत याची व्याप्ती वाढवत विविध पैलू एकत्र करून साक्षरतेची व्याख्या विस्तृत करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे या विषयी कौतुकच आहे. पण डिजिटल साक्षरता किंवा आज रोजीच्या धोरणात्मक कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान, महत्वपूर्ण जीवन कौशल्ये ,व्यावसायिक कौशल्य विकास, मूलभूत शिक्षण, निरंतर शिक्षण ही सर्व शिक्षणाची अतिशय उत्कृष्ट अशी पद्धती जरी असली तरी; माझ्या मते अपूर्ण आहे.
नम्रता आणि सत्यनिष्ठता
मूळ शिक्षणा विषयी आजपर्यंत जे कोणी थोर विचारवंत किंवा समाजसुधारक होऊन गेले त्यांनी वेळोवेळी एका गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधले आणि ते म्हणजे ‘गुणसंपन्न साक्षरता’ अर्थात हा शब्द माझा आहे पण, जे काही विचारवंतांचे विपुल लेखन आहे. त्यामधील सार जर आपण पाहिले तर गुणात्मक शिक्षण पद्धतीवर त्यांचा विशेष भर होता. बरं जे भारतात विचारवंताचे विचार होऊन गेले तसेच परदेशातही असे विचार व त्यावर विपुल लेखन झालेले आहे.
- “शिक्षण म्हणजे माणसाच्या अंतर्यामी आधीपासूनच दडलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे म्हणजे शिक्षण नव्हे.” – स्वामी विवेकानंद
- “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. प्रज्ञा, शील आणि करुणा हे शिक्षणाचे मुख्य उद्देश असले पाहिजेत.” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- “सर्वोच्च शिक्षण तेच आहे, जे केवळ आपल्याला माहिती देत नाही, तर आपले जीवन सर्व सजीव सृष्टीशी आणि निसर्गाशी एकरूप करायला शिकवते.” – रवींद्रनाथ टागोर
- “शिक्षणामुळे सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेमुळे विचार करण्याची सवय लागते, विचारांमधून ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हाला महान बनवते.” – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
- “शाळेत शिकलेले सर्व काही विसरून गेल्यानंतर जे काही शिल्लक राहते, तेच खरे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे केवळ तथ्ये (Facts) पाठ करणे नव्हे, तर विचार करण्यासाठी मनाला दिलेले प्रशिक्षण आहे.”- अल्बर्ट आईन्स्टाईन
- “शिक्षण हे जगातील असे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही संपूर्ण जग बदलू शकता.”. – नेल्सन मंडेला
- “माणसाला सखोल आणि गंभीरपणे विचार करायला शिकवणे हे शिक्षणाचे खरे कार्य आहे. बुद्धिमत्ता आणि चारित्र्य (Intelligence plus character) – हे खऱ्या शिक्षणाचे ध्येय आहे.” – मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर
“हृदयाला (संवेदनांना) शिक्षित न करता केवळ बुद्धीला शिक्षित करणे, म्हणजे अजिबात शिक्षण न घेणे होय.” – अॅरिस्टॉटल (Aristotle)
वरील वाक्यांचा आपण जरा गांभीर्याने विचार करायलाच हवा. कारण समाजात असलेली असहिष्णूता, वाढती गुन्हेगारी तसेच छोट्या छोट्या गोंष्टीना लक्षात घेतले तरी जसे वाहन चालवताना हलगर्जी पणा, जागोजागी थुंकणे, कचरा टाकणे हे पाहता लक्षात येते की, ह्या गोष्टी कदाचित पूर्णपणे नाहिश्या करता येणार नाहीत पण निश्चितच यामध्ये लक्षणीय घट मात्र करता येऊ शकते. पण याकरिता आवश्यक आहे ते म्हणजे “नम्रता व सत्यनिष्ठता गुणांनी परिपूर्ण शिक्षण पद्धती ज्यात सध्याच्या कौशल्यपूर्ण शिक्षणा सोबत सामाजिक कर्तव्ये, जबाबदारीचे असलेले भान प्रत्येकात विकसित करणे यालाच माझ्या दृष्टीने – गुणसंपन्न साक्षरता” म्हणता येईल. आणि म्हणले गेले आहेच ना :
“सार सार ते घ्यावे, फोलपट सांडूनी द्यावे.” – संत तुकाराम महाराज
“ज्याप्रमाणे भुंगा फुलाचा रंग आणि सुगंध न बिघडवता केवळ त्यातील मध गोळा करून निघून जातो, त्याचप्रमाणे शहाण्या माणसाने लोकांच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करावेत.” – तथागत गौतम बुद्ध
“जगात कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू पूर्णपणे निर्दोष नाही. त्यामुळे इतरांमधील वाईट शोधण्यापेक्षा त्यांच्यातील चांगल्या गुणांचा स्वीकार करा आणि स्वतःचा विकास साधा.” – स्वामी विवेकानंद
तेव्हा, जपानसारख्या किंवा इतर प्रगत देशांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, आपण आपल्या भारतातील शिक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करायला काय हरकत आहे? हे नाकारता येणार नाही की, आपली सध्याची शिक्षण पद्धती बऱ्याच अंशी इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि केवळ ‘कारकून’ घडवण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थेवर आधारलेली आहे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही आपण तीच साचेबद्ध पद्धत अनेक दशके पुढे ढकलत राहिलो.
आजघडीला आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्नच होत नाहीत, असे माझे मुळीच म्हणणे नाही (सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण हे त्याचेच एक उदाहरण आहे). परंतु, ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला?’ या म्हणीप्रमाणे आजची प्रत्यक्ष परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर आहे. ज्या भारतभूमीत एकेकाळी तक्षशिला आणि नालंदासारखी जागतिक कीर्तीची विद्यापीठे होती आणि जिथे केवळ ज्ञानाची पूजा केली जायची, तिथे आज शिक्षणाचे जे उघड व्यापारीकरण झालेले दिसते, ते पाहून एक सुजाण नागरिक म्हणून मन खरोखरच खिन्न होते.”
मी समजू शकतो की, जसे साक्षरता मोजता येते तशी गुणवत्ता मोजता येत नाही आणि ह्या अडचणीला समोरे जर कोणी गेले असेल तर मला वाटते जपान ह्या देशाने ह्यावर निश्चितच पूर्ण प्रयत्न केले आहेत. जपान मध्ये शिक्षण क्षेत्रातील पॉलिसी ठरवताना
ज्ञानाआधी संस्कार (Manners Before Knowledge): जपानमध्ये पहिली ते चौथीपर्यंत (वयाची १० वर्षे पूर्ण होईपर्यंत) विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मोठ्या लेखी परीक्षा घेतल्या जात नाहीत. या सुरुवातीच्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेण्याऐवजी त्यांच्यात चांगली वागणूक, नम्रता, प्रामाणिकपणा, इतरांबद्दल आदर आणि निसर्गावर प्रेम करण्याची वृत्ती विकसित करण्यावर पूर्ण भर दिला जातो.
नैतिक शिक्षण (Dōtoku): जपानच्या अभ्यासक्रमात ‘दोतोकू’ (Dōtoku) म्हणजेच ‘नैतिक शिक्षण’ हा एक स्वतंत्र आणि अनिवार्य विषय आहे. यात केवळ पुस्तकी धडे नसून, प्रसंग देऊन त्यावर विचार करायला लावला जातो.
स्वच्छतेतून नम्रतेचा धडा (O-soji): जपानच्या शाळांमध्ये सफाई कामगार नसतात. विद्यार्थी आणि शिक्षक रोज ठराविक वेळ काढून स्वतःचे वर्ग, शाळेचा परिसर आणि अगदी स्वच्छतागृहे (Toilets) एकत्र मिळून स्वच्छ करतात. या एका कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये ‘कोणतेही काम हलके नाही’ ही भावना आणि ‘नम्रता’ मुळापासून रुजवली जाते.
एकत्रित भोजन आणि कृतज्ञता: शाळेत विद्यार्थी स्वतः आपल्या वर्गमित्रांना जेवण वाढतात आणि सगळे एकत्र बसून जेवतात. जेवणाआधी अन्नाविषयी आणि ते बनवणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. यातून समता आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार होतात.
वाचायला छान वाटते ना? पण ही पद्धत आपल्याकडे राबवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांची नाही, तर संपूर्ण ‘शिक्षण व्यवस्थेची’ मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अनेक शिक्षकांनी मुलांची आयुष्ये घडवली आहेत, हे नाकारता येणार नाही. पण आजच्या वाढत्या व्यावसायिक स्पर्धेत आणि मूल्यांच्या ऱ्हासामुळे काही वेळा लहान मुलांना मारहाण होण्याच्या किंवा काही दुर्दैवी घटनांच्या बातम्या कानावर येतात, तेव्हा मन विषण्ण होते. म्हणूनच, या व्यवस्थेत केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा पुन्हा एकदा संस्कारांची आणि नैतिकतेची जोड देणे काळाची गरज बनली आहे.
आता आपण पाहिलेच बोललो त्याप्रमाणे, ‘गुण कसे देणार की तुम्ही खरच चांगले आहात?’ तर जी पद्धत त्यांच्या कडील मुलांकरिता आहे तीच पद्धत कौतुकास्पद आहे असे वाटते.
नम्रता, प्रामाणिकपणा किंवा सत्याग्रही वृत्ती याचे मोजमाप कारणे शक्य नसते यामुळे जपान मध्ये मार्कांऐवजी निरीक्षणावर भर दिला जातो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या रोजच्या वागणुकीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करतात. विद्यार्थी सगळ्यां मध्ये कसा वागतो, इतरांना मदत करतो का, शाळेच्या मालमत्तेची काळजी घेतो का, या नोंदी ठेवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये या वागणुकीबद्दल शिक्षकांचा सविस्तर अभिप्राय असतो, आकडेवारी नाही याला खऱ्या अर्थाने गुणात्मक मूल्यमापन केले असे म्हणता येईल.
आणि जपानमध्ये या शिक्षणाचे खरे मोजमाप शाळेच्या चार भिंतीत नाही, तर त्यांच्या समाजात होते असे मला वाटते कारण समाजातील वर्तन हीच खरी परीक्षा असे म्हणता येईल शेवटी आपण सर्व जण आज इंटरनेट च्या माध्यमातून पाहतो की, जपान मध्ये रस्त्यांवर कचराकुंडी नसूनही रस्ते अतिशय स्वच्छ असतात. तसेच भूकंप आणि जपान चे नाते खूप जवळचे आहे नेहमीच भूकंप येत असतात अश्या वेळी भूकंप किंवा त्सुनामीसारखी भयंकर आपत्ती आल्यावरही लोक अन्न किंवा पाण्यासाठी झुंबड न उडवता शांतपणे रांगेत उभे राहतात आणि, ही गोष्ट निश्चितच साधी नाही.
आणि मग आपल्याला कदाचित अवघड वाटेल पण रेल्वे किंवा सार्वजनिक ठिकाणी जपान मधील लोक ज्या पद्धतीने शांतता पाळतात ही गोष्ट त्यांच्या साठी काही मोठी वाटण्याचे कारण नाही कारण जी व्यक्ती भूकंपात देखील स्वत: च्या मूल्यांची शिकवण जोपासते ती साध्या-साध्या गोष्टींमध्ये कशी विसरेल.
तर मग वाचकहो मला जे वाटते ते मी या लेखात लिहिले पण आपल्याला काय वाटते ते देखील निश्चित पणे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आम्हाला तुमचे विचार वाचायला नक्की आवडतील. तसेच अश्याच विविध विषयांवरील लेख वाचण्या साठी Kridavishwa.in ला नेहमी भेट देत रहा.






